इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी )
स्वच्छतेचे जनक, थोर
समाजसुधारक श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या पवित्र दिवशीच पंढरपूर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशभरातील वारकऱ्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र, आज याच पंढरपूरमध्ये अस्वच्छ रस्ते, कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी आणि मूलभूत सुविधांचा अभाव पाहून वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
वारकऱ्यांचा हाल; श्रद्धेला लागतोय तडा
पायी दिंड्या, कुटुंबासह आलेले भाविक, वृद्ध व महिला वारकरी यांना मंदिर परिसर, घाट, रस्ते व विश्रांती स्थळांवर अस्वच्छतेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहे अपुरी, कचरा वेळेवर न उचलणे, सांडपाण्याची समस्या यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
गाडगे बाबांच्या विचारांना हरताळ?
स्वतः झाडू घेऊन समाजात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच ही परिस्थिती असणे म्हणजे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अपमान नाही का? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
प्रशासनाची जबाबदारी कुणाची?
नगरपालिका, देवस्थान ट्रस्ट व संबंधित प्रशासन यांच्याकडून दरवर्षी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जातो. मग प्रश्न असा पडतो की— हे पैसे जातात कुठे?
नियोजन फक्त कागदावरच का?
वारकऱ्यांच्या सोयीसाठी ठोस उपाय कधी होणार?
‘स्वच्छ भारत’ फक्त फलकांपुरताच?
स्वच्छ भारत अभियानाचे फलक, घोषणा आणि फोटोसेशन मोठ्या प्रमाणात दिसतात; मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. यामुळे पंढरपूरसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे.
जनतेची मागणी
वारकरी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत— नियमित व प्रभावी स्वच्छता मोहीम
पुरेशी स्वच्छतागृहे व पाणी व्यवस्था
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई
भाविकांसाठी मूलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करणे
प्रश्न कायम:
“संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीला तरी प्रशासन जागं होणार आहे का, की वारकऱ्यांच्या श्रद्धेची अशीच हेळसांड होत राहणार?”
