शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )
पुणे : मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता ग्राम पातळीवर सभा घेऊन योजनेकरिता प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना बारामती व इंदापुर तालुक्यात राबविण्याच्या अनुषंगाने कवीवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे गुरुवारी (दि.८) कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी व भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक, नायब तहसीलदार,
सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र. लवेसू-२०२५/प्र.क्र.४५८/भूमापन / (ल-१) दि. २९ ऑगस्ट २०२५ अन्वये ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्याचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबत कार्यपध्दती व महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय लवेसु-२०२५/प्र.क्र.२/ पाणंद रस्ते, दि.१४ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरु करणे आणि ती राबविण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत, त्याअनुषंगाने प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकानी मिळून कार्यवाही करावी, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.
या कार्यशाळेला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
