संजय गायकवाड
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला — “राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही, भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे. मात्र काँग्रेसमध्ये सन्मान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, कॉंग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहा.”
शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) उरण तालुक्यातील शेलघर येथे दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात झालेल्या रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महेंद्रशेठ घरत यांनी या वेळी पक्षशिस्त, निष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या सन्मान या तीन घटकांवर भर देत सांगितले,
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज भरावेत. सर्व अर्जांची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल. पक्षाला प्रामाणिकपणे साथ देणाऱ्यांनाच पुढे संधी मिळेल.”
या बैठकीत रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,
“कॉंग्रेसच्या सध्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे. तालुका अध्यक्ष हे संघटनाचे केंद्रस्थान आहेत. उमेदवार सक्षम, जनाधार असलेला आणि समाजाशी नाते जपणारा हवा. परिस्थितीनुसार कॉंग्रेस स्वबळावर लढण्यास तयार आहे. काँग्रेस हा एक परिवार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा त्याचा अविभाज्य भाग आहे.”
या वेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले,
“भाजपमुळेच देशात महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, ही भावना जनतेत दृढ होत आहे.”
बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील घोळ, निवडणूक तयारी आणि उमेदवारीसंबंधी आपली मते मांडली. “तिकीट मिळो वा न मिळो, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या बैठकीतून आगामी निवडणुकांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह दिसून आला.
या प्रसंगी रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल, प्रदीप राव (अलिबाग प्रभारी), डॉमिनिक डिमेलो (उरण प्रभारी), मनोज कांबळे (पेण प्रभारी), अशोक मोरे (श्रीवर्धन प्रभारी), सुरेश काटकर (महाड प्रभारी), सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अॅड. श्रद्धा ठाकूर, डॉ. मनीष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत, नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिलोत्री, निखिल ढवळे, तसेच तालुका अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतून रायगड जिल्हा काँग्रेसने कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचा संदेश दिला असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
“कॉंग्रेस म्हणजे सन्मान, एकजूट आणि जनतेचा विश्वास” — महेंद्रशेठ घरत
