स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दि. 06 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नियमित प्रेस नोटनुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी अवैध धंदे, वाहतूक नियमभंग, जुगार, गांजा लागवड, मद्यधुंद वाहनचालक तसेच मारहाण व मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर व्यापक कारवाई करत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला आहे.
सर्वप्रथम धाराशिव शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांनी 5 ऑगस्ट रोजी विशेष वाहतूक मोहिम राबवून 364 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत ₹3,25,950 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
अवैध मद्याविरोधात दोन कारवाया
येरमाळा पोलिसांनी इंदापूर (ता. वाशी) येथील एका व्यक्तीकडून सुमारे ₹20,200 किमतीच्या 200 टेट्रा पॅक अवैध देशी दारूचा साठा जप्त करून महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
तामलवाडी पोलिसांनीही खडकी परिसरातून 20 सीलबंद बाटल्या जप्त करत संबंधित आरोपीवर मद्य मनाई कायद्यानुसार कारवाई केली.
जुगार अड्ड्यांवर धाडी
नळदुर्ग पोलिसांनी सलगरा-गंधोरा मार्गावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले.
आनंदनगर पोलिसांनी शिंगोली येथील एका जनरल स्टोअर्समध्ये सुरू असलेल्या मटका जुगारावर कारवाई करत रोख रक्कम व साहित्य जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
मद्यधुंद वाहनचालकावर गुन्हा
आनंदनगर पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई केली.
सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा
परंडा, लोहारा व नळदुर्ग पोलीस ठाण्यांनी सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
अवैध गांजा लागवडीचा पर्दाफाश
धाराशिव ग्रामीण पोलिसांनी जहागीरवाडी परिसरातील शेतात 8.325 किलो वजनाची, सुमारे ₹1.66 लाख किमतीची गांजाची लागवड उघडकीस आणली. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.
चोरीचा गुन्हा उघड
धाराशिव शहर पोलिसांनी घरफोडी करून मोबाईल फोन व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.
मारहाणीच्या गंभीर घटना
येरमाळा, उमरगा आणि कळंब पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमिनीचा वाद, जुने वाद आणि किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये अनेक आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये लाकडी दांडके, काठ्या, दगड व इतर वस्तूंनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचा स्पष्ट संदेश
धाराशिव जिल्हा पोलिसांनी अवैध धंदे, वाहतूक नियमभंग, अंमली पदार्थ, जुगार आणि कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर भूमिका कायम ठेवली असून अशा कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे या कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
