स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

परभणी:
नागरिकांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा व्हावा, पोलीस व जनतेमधील संवाद वाढावा आणि लोकाभिमुख कामकाजातून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत १८ ऑगस्ट रोजी त्यांनी परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नांदेड परिक्षेत्रातील जिल्हा कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दरमहा जिल्हा मुख्यालयांना भेटी देतात. परभणी दौऱ्यादरम्यान कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी ३:०० ते ४:३० या वेळेत ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘जनसंवाद’ उपक्रमातील ठळक घडामोडी:
१८ तक्रारदारांचे अर्ज प्राप्त: या संवाद सत्रात एकूण १८ नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या तक्रारींचे लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सादर केले.

तक्रारींचे स्वरूप: यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता विषयक वाद, पोलीस संरक्षण, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यांसंबंधीच्या तक्रारींचा समावेश होता.
अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना: प्राप्त तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व तक्रारींवर त्वरित व निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

‘संवेदना’ प्रणालीद्वारे होणार पाठपुरावा:
नागरिकांच्या अर्जांचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने सुरू केलेल्या ‘संवेदना’ तक्रार निवारण प्रणालीमध्ये हे सर्व अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांवर स्थानिक स्तरावर नेमकी काय कारवाई झाली, याचा थेट पाठपुरावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील ‘फीडबॅक टीम’मार्फत घेतला जाणार आहे.

या जनसंवाद कार्यक्रमास परभणीचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच परभणी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी ऐकून घेतल्याने नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed