नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
पाटस, ता. दौंड, जि. पुणे :
पाटस परिसरातील नागनाथ तलावामध्ये सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याचा साठा पूर्णपणे आटत चाललेला असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सदर तलावातून पाटस व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
सध्याच्या परिस्थितीत तलावातील पाणीसाठा अत्यल्प झाल्यामुळे नागरिकांना केवळ एक वेळच पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जलजीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत देखील या तलावावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत संभाजी ब्रिगेड पुणे शहरच्या वतीने पाटबंधारे विभाग, दौंड यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे खडकवासला मुठा कालव्यातून तात्काळ नागनाथ तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
“सध्या पाटस व परिसरातील नागरिकांना अत्यंत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ पाणी सोडून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे अविनाश अरविंद मोहिते, महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पुणे शहर यांनी सांगितले. जर तातडीने पाणी सोडण्यात आले नाही, तर येत्या काही दिवसांत पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यावर व दैनंदिन जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पाटस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शंकर पवार, मिथुन चव्हाण, इमरान खान, शिवाजी साळुंखे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपर्क :
अविनाश अरविंद मोहिते
महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे शहर
मो. नं.8600569696

